Saturday, August 17, 2013

लग्न

 लग्न म्हणजे काय रे भाऊ?
 छोटा विचारीत आला
 गहन विषय सोपा
 कसा करून सांगू त्याला?

 लग्न म्हणजे मीलन
 का लग्न म्हणजे जुगार?
 लग्न म्हणजे तोंड दुसरे
 वाटून खाण्या पगार?

 लग्न दगडाखालचा विंचू
 लग्न फुरफुरणारा साप
 लग्न म्हणजे स्वातंत्र्याला 
 घट्ट लावलेला चाप?

 लग्न म्हणजे तडफड
 का लग्न नुसता अट्टाहास
 क्षणाच्या आनंदाकरिता असे
 का कवटाळिलेला एक फास?

 अनेक प्रश्न छोट्याचे
 हेलाविती मनाला 
 कसे समजाऊ ना कळे
 त्या भाबड्या जीवाला 

 कोण सांग ऐकवी
 ह्या अशा गोष्टी तुला?
 कधी समजावून घेतलेस
 का रे तू बागुलबुवाला?

 लग्नाचा ऊहापोह
 सांगितला रे तुला कोणी?
 सूर राग जरी न कळे
 तरी गायलीसच ना तू गाणी?

 बावळ्या लोकांपरी तू
 चर्चा कशास मांडली?
 गंध वास ही न घेता
 फुले जी त्यांनी सांडली

ज्या गोष्टी जगताना
नव्याने रोज भेटती
त्यांची चर्चा अपूर्णातच
का बरे हे फेटती?

लग्न हे स्वप्न सुंदर
लग्न जीवनातील सेतू
समरसून ते जगावे
हाच ठेवावा तू हेतू

लग्न दोघांचा प्रवास
लग्न दोघांची कहाणी
लग्न हे द्वंद्वगीत
प्रेमकाव्य वा विराणी

जे प्रवासे सापडावे
चार डोळ्यांनी पहावे
कालच्या ग्रीष्मासही मग
सुखानेच आठवावे

हातावरी जमवावे अश्रू
सुखदु़:ख जय भयाचे  
दोघांनीच घेता ओठी
प्रत्येक थेंब ते मधाचे

Wednesday, August 7, 2013

काहीही

 डोंबिवली वासी, वास नाकाशी, कचरा दाटे चोहीकडे
 क्षणात येती समोर वासरे, क्षणात मागे डुक्क्रर फिरे

 स्टेशन बघता अलोट गर्दी, जीव जाई शिणलासे
 काँक्रीट्च्या ह्या बिल्डींगींचा गोफ कुणई हा विणलासे?

 झालेले जंगल हे वाटे, गच्च आहाहा ठाण्यात
 तापती जन, मृत्यू दारी, कावळे पडता पाण्यात

 फडफड करूनी भिजले आपुले कपडे जन हे आवरती
 गर्दी हेची प्राक्तन धरूनि मनास अपुल्या सावरती

 वासाचेच अत्तर करूनि प्रफुल्लित मग जन होती
 सगळ्या चिंता फाटी मारूनी मराठी मने ती सजती

 पाट वाहती कलागुणांचे गुणीजनांच्या नगरात
 मराठीयांच्या संस्कृतीचे, वर्धन होते थाटात

 प्राप्य जीवना कवटाळावे कसे ते पहावे नीट
 कल्लोळातही श्रावण फुलतो मग अपुल्या डोंबिवलीत

Monday, August 5, 2013

नव्या युगातील नव्या दमाचा

केशवसुतांची माफी मागून त्यांच्या कवितेचे विडंबन तुमच्या भेटीस आजच्या शुभदिनी देत आहे

नव्या युगातील नव्या दमाचा अट्ट्ल बेवडा आहे
कोण मला ऊचलून घरी नेऊ शकतो मी पाहे
व्हिस्की, व्होडका, देशी दारू, न मी एक पंथाचा
तेच पतित की जे चालविती घोष दारूबंदीचा
चकण्यासाठीच माझी भूक,
'चतकोराने' (क्व्रार्टर) मला न सूख,
पब मधला मी नच मंडूक,
गुत्त्यास श्रावणी कुंपण पडणे अगदी मला न साहे
कोण मला ऊचलून घरी नेऊ शकतो मी पाहे

जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र गटारे लोळण्यास बघ मला दिसताहेत
कोठेही जा फेसाळणारी शांभवीच मज दिसते
कोठेही जा हातांमधले चषक पहा चमकते
कॉलेजातली तरूण मुले
दारूत जशी मोहाची फुले
बघता तन हर्षून "डुले"
मी त्यांची, ती माझी - एक गटार आम्हातून वाहे
नव्या युगातील नव्या दमाचा अट्ट्ल बेवडा आहे

पुजितसे मी कोणाला - तर मी पूजी दारूला
बाटलीमध्ये विश्व पाहूनी पूजी मी विश्वाला
'बास' ह शब्दच मजला नलगे, संपुष्टी हे लोक
आणुती तो, वर बूच लाविती फिरती दुनिया न देख,
"लहान मोठे" (स्मॉल्/लार्ज) मज न कळे
सॉफ्ट हार्ड हे द्वयही गळे
देशी विदेशी भाव पळे
सर्वच अट्ट्ल बेवडे जवळ त्या गुत्त्या जवळी मी राहे
कोण मला ऊचलून घरी नेऊ शकतो मी पाहे

चकण्या करिता काजूवरती कण चढती लवणाचे
स्वान्तसुखाच्या केंद्राभवते पाक मधूर मदिरेचे
आत समचि ऊदास हृदय वरी स्रदृश आनंदी तो फेस
परी अन्या वाटेला लावी वाहत गटारी तोच
अशी स्थिती ही असे जनी
बेहोष मुक्त तरूण मनी
चिंतामुक्त गटारी दिनी
चंगळाचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे
प्रेषित त्याचा नव्या युगाचा अट्ट्ल बेवडा आहे

मुकुल जोशी

Tuesday, November 22, 2011

देऊळ - जेथे कर माझे जुळती

मला आवडणारी देवळं ३. एक सारसबाग, दुसरं पर्वती आणि तिसरं कोथरूडमधलं पूजा पार्क. त्यात काल अजून एकाची भर पडली. हे देऊळ म्हणजे ऊमेश आणि गिरीश कुलकर्णींनी घडवलेलं आणि घोलपांच्या फंडातून ऊभं राहिलेलं.

काल रात्री देऊळ पाहिला. एक नितांतसुंदर कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळालं. ही "पोस्ट" म्हणजे देऊळ ची समीक्षा नाही. माझ्यासारख्या पामराने ती करूही नये. मिळालेल्या समाधानातून अगदी सहज सांगावं असं वाटलेलं इथे लिहीत आहे.

देऊळ ही कथा घडते एका अगदीच छोट्या गावात. गावातली प्रमुख वस्ती, छोट्या टेकाडावरून पाहिलं तरी नजरेत मावेल एवढी. विशेष काहीच न घडणारं आणि त्यामुळे अगदी छोट्या प्रसंगांची ही बातमी व्हावी असं हे गाव. गावातली कॅरॅक्टर्स म्हणजे राजकारणी, नशिबाला दोष देत रिकामधंदे करणारे टोळभैरव, समज आणि विवेक ह्याच्या जोडीने गावाच्या विकासाची आस धरणारे अण्णा, महिला आरक्षणातून निवडून आलेली सरपंच, गावच्या काड्यांतून कुठे विस्तव पेटवता येईल का ह्या शोधात असणारा पत्रकार, एक निरागस आणि निखळ व्यक्तीमत्त्वाचा तरूण केशा, त्याचं कुटुंब आणि इतर गावकरी. चित्रपटाचा वेग हा गावातील एकंदर घडामोडींच्या वेगाशी नाळ साधणारा.

अशा पार्श्वभूमीवर केशाला एका ऊंबराच्या झाडाखाली पहूडलं असताना दत्ताचा साक्षात्कार होतो. गावात दत्त आल्याची बातमी होते आणि गावातल्या समाजकारणाला एक वेगळंच वळण लागतं. "विकासाची" स्वप्न साकारायचं राजकारण अगदी स्वाभाविकपणे शिजू लागतं आणि बघता बघता गावात दत्ताचं देऊळ ऊभं राहातं. दत्ताचा "टीआरपी" वाढवायचे सर्व नैतिक, अनैतिक प्रकार घडतात आणि सगळं गावंच त्या क्षेत्राच्या तीर्थात आपले हात ओले करू लागतं. ह्या सर्व प्रकाराचा फोलपणा आणि त्यातली अनैतिकता पटत नाही ती फक्त अण्णांना. ह्या सर्व प्रकाराचं योग्य फलित प्राप्त करणं कोणाच्याच हातात नाही हे अगतिकपणे बघत असताना ते गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतात. आता ऊरतो तो फक्त केशा.

केशाची वास्तल्यस्थानं असतात ती दोन - एक दत्त आणि दुसरी त्या दत्ताची गाय, करडी. ऊरलेल्या गावकर्‍यांचा संबंध असतो तो फक्त "देऊळाशी". जेव्हा व्यावसायिक प्रगतीने बेधुंद झालेल्या गावात करडीचा अंत होतो आणि केशाला त्याच्या देवापासून वेगळं केलं जातं तेव्हा त्याला ह्या अवडंबराच्या वास्तवाची जाणीव होते. ऊद्विग्नावस्थेतला केशा भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवणार्‍या त्या दत्ताला देऊळातून "मुक्त" करतो. गावकर्‍यांचा देव मात्र मूर्तीतच असल्याने ते दुसरा "देव" आणून पुन्हा देऊळ सुरू करतात.

ही कथा पडद्यावर कसा आकार घेते हे प्रत्येकाने प्रत्यक्षच पहावं. मार्मिक आणि प्रसंगनिष्ट विनोदी अंगाने खुलवलेली ही कथा कुठेही त्यामागची वैचारिक बैठक सोडत नाही. खेड्यातल्या समाजातले आणि देशातल्या धार्मिक संस्कृतीचे ऊद्विग्न करणारे प्रश्न डोळ्यासमोर ऊभे करताना लेखक आणि दिग्दर्शक कुठेही कुठलाही ऊपदेश करत नाहीत पण योग्य ते भाष्य करायचं सोडतही नाहीत. विनोदाची साथ घेताना कुठेही कथा गांभीर्याशी फारकत घेऊन ऊथळ होत नाही तशीच कुठेही गांभीर्याच्या आहारी जाऊन मूळ विनोदी अंग सोडत नाही. धार्मिक अवडंबराचं संपूर्ण "दर्शन" घडवताना, देव - भक्ती - धर्म - संस्कृती ह्या संकल्पनांना कुठेही तडा जाऊ न देता - खरंतर तेही केशाच्या आणि अण्णांच्या विचारातून योग्यतेने दाखवण्याचं अवघड काम ऊमेश आणि गिरीश अतिशय सहजतेने करतात. ह्या जोडीचं खूपच कौतुक!

"देऊळ" मधले कित्येक प्रसंग लक्षात राहतात ते त्यातल्या साधेपणामुळे, मार्मिकपणामुळे आणि कलाकारांनी ऊत्कृष्टपणे वठवलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे. योग्य कथा आणि दिग्दर्शन लाभलेल्या गुणी मराठी कलाकारांकडून असा अभिनय घडणं हे आपल्याला नवीन नाही. परंतु सिनेमात केलेला कॅमेराचा आणि प्रकाश्/छायेचा वापर हा "देऊळ" ला एका वेगळ्याच ऊंचीवर नेऊन ठेवतो आणि ही कला मराठी चित्रपटात आणल्याबद्दल ऊमेश आणि टीमचं विशेष अभिनंदन. चित्रपट पहाताना अनेक फ्रेम्स नजरेला वेड लावतात. सिनेमा सुरूच होतो तो वाळूत रेखाटन केलेल्या सुरेख नामावलीपासून. आणि संपतो तो श्रेयनामावलीत वाटा असलेल्या प्रत्येकाचा न चुकता ऊल्लेख करून. रॉटरडॅमचा ऊल्लेख असणारं "ईस्टर एग" ह्या टीमबद्दल जरा जास्त माहिती असणार्‍यांसाठी मस्त वाटतं.

वळू, विहीर आणि देऊळ ह्यातून गिरीश आणि ऊमेशची एक स्वत:ची स्टाईल असल्याचं लक्षात येतं. कथेची पडद्यावरची हाताळणी, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत ह्यातून ती जाणवते. एका दिग्दर्शकासाठी हे एक मोठं यश आहे आणि ऊमेश कुलकर्णीने ते फार लवकर मिळवलं आहे. त्याच्या कलाकारांचा संच पण अगदी छान जमला आहे. मात्र पुन्हा त्यांनी गावातल्या पार्श्वभूमीवर हेच कलाकार घेऊन सिनेमा केला तर त्यात तोचतोचपणा येईल की काय माहित नाही. तो येऊ न देण्याची क्षमता ह्या दोघांत निश्चितच आहे.

परवा गिरीश कुलकर्णीशी "देऊळ" वर गप्पांचा कार्यक्रम आयोजित झाला होता. सिनेमा न पाहिल्यामुळे त्याला गेलो नाही. देऊळ आधी पाहिला असता तर त्यात सहभागी होता आलं असतं ही रुखरूख आता थोडे दिवस राहील.

असो. ब्लॉगच्या वाचकांनो (म्हणजे दोन तीन लोक :-)) "देऊळ" जरूर पहा आणि अशाच सुंदर कलाकृती आपल्याला बघायला मिळोत ह्याबद्दल आपापल्या देवाकडे प्रार्थना करा.

Tuesday, July 26, 2011

स्मृतीभंश

एकदा एक कोल्हा म्हणे झालंय ऊदास जंगल
खेळ घेऊन सगळ्यांचे ऊडवून देऊ दंगल

सिंह झाला खूष म्हणे मस्त ऊपाय काढला
ताबडतोब सगळ्या जंगलांना निरोप त्याने धाडला

जंगल लागले कामाला साफसूफ झाली सुरू
रहायला नवीन गुहा आणि नवीन ग्राऊंड करू

कोल्हा होता नायक त्याची सगळीकडे देखरेख
सगळ्या खर्चाचा भार ऊरी, रोज फाडू लागे चेक

बघता बघता दिवस ऊजाडला आले सगळे चमू
क्रीडानगरीत धमाल ऊडवायला खेळिये लागले जमू

गुहा होत्या गळक्या आणि स्टेडियम फुटके
आईस हॉकी खेळतानाही बसू लागले चटके

प्राणी सर्व चिडले म्हणती व्यवस्था ही कसली?
एवढा खर्च करूनही स्पर्धा का ही पिचली?

घेतलं कोपर्‍यात कोल्ह्याला आणि विचारला जाब
अशी कशी परतफेड जेव्हा केली राब राब?

कोल्हा म्हणे कोणती स्पर्धा? कसले पैसे कसले चेक?
पाच वर्षे झाली, मला आठवत नाही काही एक.

प्राणी म्हणती असं कसं, खात होतास तेव्हा?
शाबूत होती स्मॄती तूझी, टेडर्स काढली जेव्हा

कोल्हा झाला निराश म्हणे ऊफराटी तुमची तर्‍हा
भूकेचा नियम नैसर्गिक लागेल तेव्हा चरा

बाकी सगळा खेळ नियतीचा मी काय करू?
स्मृतीभंशात चूक झाली दंड कसा भरू?

माकड होता वैद्य त्याला आणलं लगेच तिथे
म्हणती तपास कर रोगाचा स्मृती गेली कुठे

माकडानेही थोडं लोणी कोल्ह्याघरी चाखलं होतं
खाल्ल्या मीठाचं ईमान त्यानेही नीट राखलं होतं

तो म्हणाला बाबांनो असाच विचित्र रोग हा
शिक्षा काय करता ज्याला आधीच आहे भोग हा

नशीब समजा फक्त पैशाच्याच गोष्टी हा विसरला
तुम्ही सहानुभूती दाखवा जर लंगड्याचा पाय घसरला

हताश झाले प्राणी काही, गुमान परत घरी गेले
त्यांचीही स्मृती धूसर झाली कोल्ह्याला ते विसरून गेले

जंगल तसंच ऊदास आहे, रोज वणवा रोज फायरिंग
राजा प्रधान मात्र म्हणती "अवर जंगल इज शायनिंग"

~ मुकुल जोशी

Tuesday, July 19, 2011

Harry Potter Movie 8 : A few disappointments

This weekend was dedicated to Harry Potter and JKR. I watched all the movies from the morning till the night and finally went to the cinema hall to mark the day by completing the marathon after watching HP 8.

The movie is good. For any fan of Harry Potter its needless to say that the movie is a must watch. That applies to any HP movie for that matter, whether they are excellent or they suck.

However, being a member of the clan that lives in the Harry Potter era, there are few things that disturbed me. And these are not great mistakes. Those of you who are into parenting will know how it feels to see your kid making a mistake at basic addition, when you know she is good at math. You are okay to accept that she fails to grasp a tricky problem. But somehow you don't like to it when there isn't a good reason to commit that kind of mistake in the first place.

Here are some such points about the movie and before you rant me about them please read the "Disclaimer" under the title of this blog.

1. 3D effects
The movie is 3D. Cool. That helps the film industry saving losses from piracy. (25% I guess, not sure) But it didn't give a feel that there is any reason beyond this to have the movie in 3D. Seriously, it has only handful of them. They could have made it a great 3D experience.

Some of the scenes are so dark that couple of times I felt like removing my 3D glasses. (I know the recent study asks you to get your eyesight checked if this happens.)

2. Not showing important aspects of the story

I would have liked to see Teddy Lupin. But that's fine. My biggest problem is not showing the story of Albus Dumbledore, Aberforth, Ariana and Grindelwald. It explains the weaker side of Dumbledore and tells that there were times when he committed mistakes for gaining power. Those who haven't read the books and have only seen the movies are now going to take Dumbledore as perfect.

3. Showing things that were un-necessary (of course IMO)

In this department there is just too much of liberty taken to add extra spice which was just not required. Sometimes it made the characters appear weaker/funny.

These things are

a. Olivander telling harry that he is f-word ed if Voldemort has got the wand.
b. Showing that Neville has crush on Luna!
c. Harry telling Hermione that their fears are indeed true, he has to die etc. etc.
d. McGongall saying she always wanted to use that spell. Yeah, that naughty-ness created a few laughs, but McGongall's character won't perhaps need that.
e. Malfoys running away like cowards ???
f. Showing too much of army. We know that the death eaters escaped from Azkaban, but this was a battle and not a war. It was mostly at personal level. Why think that big and grand means best always?
g. Harry falling down with Voldemort saying "Tom, lets end it together the way it started".. or something of that sort. Seems like Parvati Patil has taken the crew to a few Hindi movies and they are super impressed with the climax dialogues.

4. Showing Voldemort's character as weaker

I love Voldemort. He is a no-nonsense villain. He means his business and he excels at it.

Remember the previous movie when he takes the wand from Lucious Malfoy? Malfoy has this nice silver handle to his wand, which Voldemort throws away. He wants just the wand and no useless decoration.

If any of you are programmers, try to recall how you feel when you see the laptops with accessories to give it different feminine looks to match the rest of the dress. The country has been on intellectual decline since the VAIOs & Dells started to manufacture these. The typical customers of these must be sending texts to their flock like "Dad got me a new lappy, its baby pink.. scho schweet"! (Very likely that the shade I mentioned is wrong, but my vocabulary doesn't go beyond basic colors and baby pink)

The way we loathe the concept and love our bare bone machine, Voldemort means his business. I was maha-impressed with this scene. We know when its a computer you talk about its processor and cores! Even if its a wand the core is what matters! You, me and Voldemort know this.

Now come to movie 8. He laughs like a comic character. I felt pain. The moment any horcrux gets destroyed Voldemort may be losing power, but lose all horcruxes on any day he is still ass-kicking powerful guy. The movie portrays him to get too weak (mentally) as if he has started losing heart in the whole business. He is trying to hide Nagini as if he knows hell will break lose on him soon. At least I felt so, and hence didn't like it.

5. 19 years later

If you don't know it, let me tell you that Prof. Flitwick and Griphook were played by the same actor. This means that the make up artists team kicks butts. No doubts.

But then, was this team serving its punishment in Azkaban when the "19 years later" scene was shot? If not they should be sent there.

Who looks of 36/37 amongst all of them? Maybe Ginny. Harry looks a bit old than usual, Ron looks like the same Ron (only clean shaven) and Hermione - are you telling us that Emma Watson will look exactly same 19 years down the line? Seriously, such a poor job at makeup!!

I am going to watch it once again for sure, and I am hoping that I don't notice anything more.

Friday, June 3, 2011

कोरी पाटी

मागच्याच महिन्यात गार्गीची पुस्तकं आणि वह्या आणल्या. पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दप्तराचं वजन पाहता मला माझं बालपण आठवलं. मी मराठी माध्यमाच्या सरकारी अनुदान असलेल्या शाळेचा विद्यार्थी. नवीन कोरी पुस्तकं विकत घेऊन वापरणार्‍या आर्थिक स्तरातला. अनेक मुलं भावाबहिणींची जुनी पुस्तक वापरत असत.

पहिलीपासूनच वेगवेगळ्या टाईपच्या शंभर आणि दोनशे पानी वह्या वापरणं ही चैन अनेकांना परवडणारी नव्हती. बाजरातून घाऊक प्रमाणात ताव किंवा रद्दीतून कोरी पानं घेऊन ही मुलं वह्या बाईंड करून घेत असत. चौथी पर्यंत तर आम्ही बर्‍याचशा लिखाणासाठी पाटी वापरत होतो.

गार्गीला मी दोन वर्षांपूर्वी पाटी आणली. कोणत्याही दुकानात आपल्याला सहज पाटी विकत मिळेल ही माझी कल्पना पार खोटी ठरली. आणलेली पाटी ही तिच्यासाठी एक गंमत किंवा खेळ ह्यापलिकडे काही नव्हतं. ईथून पुढेही ह्यात काही बदल घडेल असं नाही. कारण आता पाटीवर लिहीणं हा शालेय ऊपक्रमांतला भागच नाही.

आमच्या वेळी दगडी पाटीवर लिहीणं हा नित्यनियमाचा भाग होता. शाळेतून दिलेला घरचा अभ्यास आणि पाढे आम्ही घरून पाटीवर गिरवून आणत होतो. माझ्यासारख्या चांगल्या (!) घरातील मुलांकडे कमी वजनाच्या डबल पाट्या असायच्या. स्पंजचा तुकडा ठेवायला एक छोटी त्याच आकारची डबी आमच्याकडे होती. कधीतरी तो न वापरता जीभेवर बोट लावून आम्ही पाटीवरचं चूकीचं लिहिलेलं खोडायचो. स्वच्छ कोर्‍या पाटीवर लिहायला खूप छान वाटायचं.

हे सगळं आता गेलं. पाटी एकदम 'डाऊन मार्केट' झाली. बहुदा ती वापरणं हे 'घाटी'पणा ठरत असावं. कोर्‍या, गुळ्गुळीत पानांच्या, चित्रं असलेल्या वह्यांपुढे पाटी एकदमच गावरान नाही का? कापडी पिशव्यांपेक्षा आकर्षक दिसणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या रोजच्या वापरात आल्या त्या ह्यामुळेच. आजकाल प्रत्येक गोष्टीला "ऊंफ फॅक्टर" लागतो, प्रियांका चोप्राचा जो आहे तसा.

पाटीला कालबाह्य करून आपण तो मिळवला खरा. पण त्यामुळे काही इतर गोष्टी घडू लागल्या. पाटीने अक्षर वळणदार होतं हे मी म्हणू शकत नाही. माझं स्वतःचं अक्षर पाह्ता मी नियमाचा अपवादच ठरेन.

१. पण माझ्या लहानपणी पेन्सिलीला टोक करण्यात माझ्या आईबाबांना फार वेळ वाया घालवावा लागला नाही.
२. जी काही खाडाखोड मी केली असेल त्याच्या स्मॄती त्या पाटीने कधी अंगावर खेळवल्या नाहीत. लिहायला शिकताना सहज होणार्‍या त्या चूकांच्या पुराव्यांवरून घरी काय किंवा शाळेत काय, मला शेरे कधी मिळाले नाहीत.
३. रेकॉर्ड न राहिल्याने कालच्यापेक्षा मी सुधारणा केली का नाही ह्याची अनाठायी चर्चा कोणी केली नाही.
४. पालक-शिक्षक संवाद (जो कधी फारसा घडतच नसे) हा, "अजून त्याच्या वेलांटीचं वळण नीट येत नाही" अशा मुद्द्यांवर कधी घडला नाही.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वॄक्षतोड, पर्यावरण, रिसायकल्ड पेपर अशा गोष्टींचं बाळकडू कोणी मला न कळत्या वयात पाजलं नाही. शाळेतून पाटी बाद करून ह्या गोष्टी मुलांच्या पचनी पडाव्यात अशी अपेक्षा करणार्‍या आपल्या सगळ्यांची पाटी, खरतर नसते हव्यास धरण्यानं कोरीच राहत्येय असं मला वाटतं. पण ती आपण जपून ठेवूया.

आपल्या लहानपणी बोरू ही जशी संग्रहालयातून पाहण्याची गोष्ट होती तशीच आपल्या नातवंडांना इतिहासकालीन लिखाणाची सामुग्री म्हणून ती दाखवायला आपल्याला ऊपयोगी ठरेल.

Monday, April 26, 2010

किमया

चेतनने केलेल्या ह्या एक उत्कृष्ट कथेचा हा स्वैर कवितानुवाद.

( पार्श्वभूमी )

मावळ प्रांतातील एक गाव छानसे
त्या किनार एका सुंदर नदीची असे
गावात ल्हानग्या घरी तरूण तो वसे
खंडोबा ज्याच्या जवळ राऊळी बसे

लवकरी ऊठावे न्याहारी करून निघावे
वनी हिंडत-भटकत, जिन्नस जमवत जावे
दो घास भाकरी ठेच्यासमवे खावे
अन् मधूर गूळाच्या खड्यात सूखा पहावे

अशी साधी भोळी आयुष्याची रेष
ना गंभीर चिंता नसती भलते क्लेष
परि ग्रहण कसे ना कळे तया लागले
ना कळे कुणा का दैव असे वागले

( आपत्ती काल )

कळस ऊडाला राऊळ भग्न जहाले
खंडोबा पडला, माल्य विखरून गेले
गावातील खंदे वीर ऊताणे पडले
कुंकू लोपले, हिरवे कंकण फुटले

हरपली शांतता, गेले सौख्य दूर
नासली निद्रा ग्लानीचा आला पूर
जागे होऊनी कळले स्वप्न नव्हते
उद्वेग, निराशा, प्रश्नच सत्य होते

जो रक्षणकर्ता तोचि तुटूनी पडला
मग मर्त्य जीवा आधार असे तो कुठला?
हा विचार घेऊनि येई आठवण एक
त्या शूर मुलाचे कार्य म्हणे तू देख

तरूण़ जरी तो असे वीरांचा वीर
तेजाचा पुंज जो, सूर्याचा अवतार
बुद्धीने तल्लख अन् मुत्सद्दी नेता
देव, देश, धर्माचा रक्षणकर्ता

( आठवणी नंतर )

नयनांस लागला दिसू ऊगवता गोळा
रंग केशरी, पोटी तेज नी ज्वाळा
जरी भासे तरीही योग मुळी हा नसे
की "भगव्या"सदृश सूर्यंबिंब ते दिसे

बळ आले अंगी तरूणा नकळत त्याच्या
रक्तातील थेंबाथेंबा फुटली वाचा
किंतु न आता ऊरे शोधता ध्येय
किमया ही त्या एकाची, जय शिवराय

Wednesday, March 31, 2010

सोनियाचा दिनू

आज ई-स‍काळचे वृत्त (मराठी चित्रपटांची हिंदीला धोबीपछाड) वाचले आणि आनंदीआनंदगडेजिकडेतिकडेचोहीकडे च झालं. आज पार्टी करायला हरकत नाही.

अशोकजींना शुभेच्छा


अशोक, तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. टी.व्ही. वरच्या जाहीरातीद्वारे तुम्ही घराघरात पोहोचला असाल. तुमची किर्ती अशीच दिवसेंदिवस वाढावी ह्यासाठी आमच्याकडून हा छोटासा प्रयत्न. आमचे असंख्य वाचक (म्हणजे ४-५) ही बातमी वाचून हर्षमुदित होतील आणि तुम्हाला दुवा देतील.

Wednesday, March 17, 2010

परदेशी विद्यापीठांना भारताची दारं खुली

आपण सगळ्यांनीच ही बातमी वर्तमानपत्रात वाचली असेल. ह्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलीआहे. वास्तविक भारतातल्या शिक्षण संस्थांची अवस्था आणि गल्लाभरू प्रवृत्ती पाहता विद्यार्थ्यांना अधिक पर्याय मिळतील. स्पर्धा वाढेल, आणि कोणतीही निकोप स्पर्धा कधीही चांगलीच. मात्र शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा निकोप मुळीच नाही.

दुर्देवाने आज आपल्या देशात आणि राज्यात राज्यकर्ता (राजकारणी) तोच बांधकाम व्यावसायिक, तोच शिक्षण महर्षी, तोच गुंतवणूकदार, तोच ऊद्योजक, तोच क्रीडा संस्थांचा सर्वेसर्वा अशी स्थिती आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणे काम करणार्‍या एखाद्या परदेशी विद्यापीठाला ते स्थिरावू देतील का?

दुसरा प्रश्न असा की परदेशातल्या कोणत्या संस्था/विद्यापीठं इथे येतील? एखादं ऑक्सफर्ड, स्टॅनफर्ड येईलही. पण कदाचित असं घडेल की तिथल्या थर्ड क्लास संस्था इथे येऊन केवळ परदेशी असल्याचा फायदा ऊठवतील. अनेक विद्यार्थी फॉरेन ब्रँड ला भूलण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आणि त्यांच्या चकचकीतपणा, जाहिरातबाजी, आर्थिक क्षमता ह्यात स्थानिक विद्यापीठं मागे पडतील.

आत्ताच निराशावादी सूर लावणं चुकीचं आहे. बघूया काय होतंय ते.

Saturday, March 13, 2010

मराठी अभिमान गीत

माझ्या आणि अनेकही काही लोकांच्या मते मी एक अंतर्बाह्य मराठी माणूस आहे. मराठी भाषा, बोली, वाङमय, संस्कृती ह्यापासून मी वेगळा होऊ शकत नाही.

' ळ' आणि 'ण' मला अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच माझा मित्र जेव्हा बालेवाडी असं न म्हणता बाळेवाडी असं म्हणतो तेव्हा मला ते आवडतं (मूळ नावात 'ल' आहे का 'ळ' आहे हे माहीत नसूनही) आणि म्हणूनच श्रेयस तळपदे स्वतः त्याच्या आडनावाचा ऊच्चार जेव्हा तल्पडे असा करतो तेव्हा मला केवळ फॅशन म्हणून अंगिकारलेल्या त्याच्या इंग्रजी गुलामगिरीची चीड येते. अनेक मराठी पालक जेव्हा आपल्या पाल्याला मराठी कसं धड येत नाही हे कौतुकाने सांगतात तेव्हा मला ते ऐकून खिन्नता वाटते.

सांगायचा मुद्दा की मी मराठी आहे एवढंच न सांगता त्या गोष्टीवर भरभरून बोलत सुटण्याइतका मी मराठी आहे. माझा हा बाणा मी आनंदाने जपला आहे मात्र तो कधी अमराठी लोकांवर लादलेला नाही.ह्या पार्श्वभूमीवर, मी जेव्हा हे ऐकलं की कौशल ईनामदारने अथक प्रयत्नांनी मराठी अभिमान गीत तयार केलं आहे तेव्हा मला खूप आनंद झाला.

असंच एक गाणं 'लख लख चंदेरी' (गीत - श्रीरंग गोडबोले, अप्रतिम संगीत - अजय अतुल, गायक - स्वप्नील बांदोडकर). त्यातलं 'प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा, बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा' नंतर जेव्हा प्रभात ची तुतारी वाजते तेव्हा प्रभात युगाच्या अनेक वर्ष नंतर जन्मलेल्या माझ्या डोळ्यासमोर त्या युगाची माझ्या कल्पनेतली चित्रं तरळू लागतात. (हेच गाणं यु-ट्यूब वर बघा, ह्याच क्षणाच्या वेळचे हेमा-मालिनी च्या चेहेर्‍या वरचे भाव, खरंतर कोणत्याही भावाचा अभाव बघा. मराठी नसण्याचा फरक तुम्हाला दिसेल. असो.) गाण्याच्या शेवटी 'मराठी पाऊल पडते पुढे' जेव्हा येतं तेव्हा आपण अभिमानाच्या परमोच्च बिंदूला पोहोचलेलो असतो.

वास्तविक ह्यासारखी अपेक्षा ठेवून महाराष्ट्र गौरव गीताचा काही भाग नुकताच ऐकला. पण निराशा झाली. म्हणजे देवकी पंडीत चं गाणं ऐकायला जावं आणि काही अपरिहार्य कारणास्तव ते नं होता त्याऐवजी वैशाली सामंत ऐकायला मिळाल्यावर जे होईल तसं झालं. कौशल ईनामदार मुलाखतीत म्हणाले की "खूप लोकांचं असं मत आहे की ते ऐकून स्फुरण चढत नाही. पण हे तसं गाणं नाहीच आहे. हे प्रेमळ गीत आहे. भाषेबद्दल असलेल्या प्रेमाचं, ओलाव्याचं." असेल बुवा. कदाचित हा हळुवारपणा माझ्यात कमी असावा.

टीपः
पहा - अजय अतुल चे लख लख चंदेरी
पहा - मराठी अभिमान गीत

Friday, March 12, 2010

पुन:श्र्च हरि ॐ

अनेक दिवस ठरवूनही न जमलेल्या अनेक गोष्टी करायचा पुनर्निश्चय केला आहे. त्यात ब्लॉग लिहीणे ही एक. आजपासून लिहूया.

Monday, February 2, 2009

Back from the vacation

I am back from a 9 day long vacation. Had been planning for it since days and it turned out to be fulfilling and exciting as expected. I will recommend the destinations, homestays/hotels and itinerary to every avid traveler. Find the details below and get back to me if you need more information.

Pune - Mangalore - Madikeri (Coorg) - Kalpetta (Wayanad) - Kozhikode - Mumbai - Pune

Day 0 - Left Pune at 6.00 p.m. Took KSRTC volvo to Mangalore. Excellent service offered by KSRTC during the journey.

Day 1 - Reached Mangalore at 8.30 a.m. Stayed at Hotel Deepa Comforts. Nice and posh executive hotel very near to the Central Bus Stand at Mangalore. Visited Pilikula Nisarg-Dhama. Had elephant ride and saw a lot of animals in well maintained zoo.


Lioness at Pilikula

Day 2 - At 10.30 took a KSRTC bus to Madikeri. Had done online booking from Pune. Excellent booking system (One can choose the seats too). Reached Madikeri (Coorg) at 2.30. The homestay provided pickup. Stayed in HoneyPotHomes.

HoneypotHomes is an excellent home stay in a 200 acres private coffee and spice planation estate in Coorg. The owners are extremely helpful and cordial. Check out some photos of the homestay and estate here


Our Home at Madikeri

Tree house in the Estate

Day 3 - Visited Talakaveri (Origin of Kaveri River) and BhagMandala. Came back to Madikeri town. Had lunch at "East End" (A must for a foodie). Went to Abbey Falls and a couple of other local places. Saw sunset at Raja's Seat.

Abbey Falls

Day 4 - Left at 8.30 and reached Dubare Elephant Camp at 9.30. Played with elephants in water. :-) Had another elephant ride. Left at 12.30. Reached Golden Temple at KushalNagar. (2nd largest Tibetan settlement in India - again a must see) On a way back visited Nisargadhama. Had Coorgi food for dinner.

Giving bath to elephants at Dubare

Golden Temple at Kushalnagar

Day 5 - Plantation estate/coffee plan visit. Stay at Tree house.

Day 6 - Left in the morning for Kalpetta, Waynad, Kerala. On the way saw Irupu falls. Visited Tholpetta Wildlife Sanctury and enjoyed a jungle safari. Spotted a lot of deers, peacocks, birds, a bison and a barking deer. Reached Waynad at late evening. Stayed at Meenmutty Resorts.

Meenmutty heights is an excellent resort at an amazingly quite and picturesque location. We had a river facing room with its other end on waterfall and plantation side.

Our home in Waynad

Breakfast place

Day 7 - Had a trek to Meenmutty Waterfalls. This is quite a tough trek and is not recommended to be done without a local guide. Spent the evening at the resort enjoying a camp-fire. Saw Slumdog Millionaire.

Day 8 - Went for a walk in the estate. Post lunch did fishing in the stream. Couldn't catch a single fish :-) Had Ayurvedic massage followed by ice-cold "stream" bath.

Day 9 - Left in the morning for Kozhikode. On the way visited Phookot lake. Cought a train to Mumbai.

Day 10 - Reached Kurla at 12.30 p.m. Took a cab to Pune. Home by 5.30 p.m.

Friday, January 16, 2009

सा-रे-ग-म-प चा निर्णय, प्रेक्षकांची पसंती का फसवणूक?

सा-रे-ग-म-प ने मागच्या आठवड्यात कार्यक्रमातून स्पर्धेचं स्वरूप काढून टाकलं आणि अनेकांना हायसं वाटलं। हा निर्णय बहुजनहिताय-बहुजनसुखाय असल्याचं दाखवण्यात ही आलं. सर्व स्पर्धकांना, त्यांच्या पालकांना हा निर्णय आवडणं हे समजण्यासारखं आहे. मात्र सगळ्यांनाच महा-अंतिम फेरीची दारं ऊघडून झी-मराठी ने प्रेक्षकांच्या मताला आणि पसंतीला मान दिल्याचा आव आणला आणि प्रेक्षकांना गंडवलं.

ह्या मुलांनी हा रेकॉर्ड केला आहे, सा-रे-ग-म-प च्या इतिहासात हे प्रथमच घडतंय वगैरे डायलॉग्स ऍकून भारावून जाणार्‍या प्रेक्षकांच्या साधेपणाचा मला हेवा वाटतो. कदाचित फार शंकेखोर स्वभाव असल्याने असेल, पण जे घडतंय ते तसंच असेल हे मानायला सहजासहजी तयार होण्याकडे माझ्या स्वभावाचा कल नाही. सा-रे-ग-म-प आणि झी-मराठी जो निरागसतेचा आव आणतंय तो मला तितकासा पटत नाही.

निर्णयाबाबत न समजणारे काही मुद्दे असे
१. महा-अंतिम फेरी मध्ये पाचच का? सहा का नाही? असं होतं तर शाल्मली ने काय घोडं मारलं? बरं एक आठवड्यापूर्वी परिस्थिती निर्णय घेण्यासारखी होती मात्र पाच जण ऊरल्यावर ती अवघड झाली असा बदल होण्यासारखं विशेष काही घडलं नाही.
२. जर का आज पाच मधून बाद कोण होणार ह्याचा निर्णय करणं शक्य नाही तर अजून काही दिवसांनी पाच मधलं सर्वोत्कॄष्ट कोण हे ठरवणं कसं जमणार आहे?
३. स्पर्धेचं स्व्ररूप "बाद-फेरी" असं होतं आणि केवळ आपला आवडता स्पर्धक बाद होऊ नये म्हणून प्रेक्षक त्याला मत देत होते. म्हणजे "अ" ऐवजी "ब" ने बाद व्हावं म्हणून प्रेक्षक "अ" ला मत देत होते. जर का "अ" आणि "ब" दोघेही अंतिम फेरीत जाणार हे माहित असेल तर देणार्‍याने एस-एम-एस चे पैसे वाया घालवले असते का? आयडिया ने ह्या प्रकारात किती एस-एम-एस लाटले ह्याचा विचार करा. आजवर ह्या पाचांना, इतर चारांपैकी दुसर्‍या कोणाही पेक्षा जास्त मत मिळावं ह्यासाठी आलेला एस-एम-एस हा निरूपयोगी ठरला. आयडिया ला पैसे मिळाले. आणि तो आम्ही अंतिम निर्णयासाठी मोजू अशी मखलाशी आता ही मंडळी करत आहेत. पण ही फसवणूकच ठरते.
४. अवधूत वैशाली ह्यांनी निर्णया च्या वेळी एकदम नाटक करणं, तेव्हाच अंतिम स्पर्धेसाठी ठरलेल्या "ज्यूरी" ची मतं दाखवणं हे सगळं पाहता, हे सगळं आयत्या वेळी ठरलं हे दाखवणं म्हणजे गंमत आहे. हा असा निर्णय घेतला जाणार हे खरंतर तेव्हाच दिसत होतं.

कोणी मला माझ्या मते ह्या पाचांचा क्रम लावायला सांगितला तर तो प्रथमेष, आर्या, कार्तिकी, मुग्धा आणि रोहित असा आहे. बाकीच्यांच्या मते क्रम वेगळा असेल. मुद्दा हा आहे की अनेक लोकांच्या मनात एक ठराविक अग्रक्रम पक्का झाला असेल. पाचातलं कोण चांगलं आणि कोण वाईट हे कळतच नाही असं सांगणारे फार असायचं कारण नाही. अनेक बायका साड्यांच्या दुकानात गेल्या की ही घेऊ का ती, अशा प्रश्नात पडतात पण दुकानातून बाहेर पडताना त्या पाच साङ्या घेऊन येत नाहीत कारण प्रकाशात नेऊन, नेसवून, पदर ऊघडून पाहिल्या की साडी बरोबर आवडही ऊलगडत जाते. (एक ही न आणणारी तुम्हाला भेटली असेल तर तुम्ही नशीब काढलंय!) सा-रे-ग-म-प ने प्रेक्षकांना एवढी समज नाही असं गृहित धरलंय.

असं का घडलं असावं ह्याचा अंदाज लावता येऊ शकतो.

१. लोकप्रियता आणि क्षमता ह्याचा मेळ घालणं कठीण होत गेलं. मुग्धाला दे मार एस-एम-एस मिळाले, आर्याला फारच कमी. मग सा-रे-ग-म-प ने हे सांगून टाकलं की ह्या वेळी शेवटपर्यंत परीक्षकांच्या मताला अर्धी किंमत असेल. आता झी ची अशी गोची झाली की लोकप्रिय मुग्धाला किंवा रोहित ला काढलं तर भविष्यातले एस-एम-एस गेले. आणि सक्षम आर्या किंवा प्रथमेष ला काढलं तर कार्यक्रमाची रंगत गेली.त्यापेक्षा त्यांनी एकदम सोपा ऊपाय काढला.
२. स्पर्धकांच्या यशाच्या आणि लोकप्रियतेच्या व्यावसायिकरणाची संधी. पाचही स्पर्धक पुढे नेऊन ती अधिकाधिक होतेय. ह्या आधी कोणत्याच स्पर्धेला ईतकं यश आणि लोकप्रियता मिळाली नाही. कोसंबी-अनघा-बोरगावकर, राघवन-ओक, ४० शीतलीमंङ़ळी .. आठवून पहा, एवढी लोकप्रिय झाली नाहीत. आता हे लोणी निसटू देणं झी आणि आयडिया ला पटलं नसावं.

ह्या अशा व्यावसायिक गोष्टींमुळे हा निर्णय घेण्यात आला असं मला वाटतं. झी, आयडिया आणि त्यांची धेडगुजरी मराठीत बोलणारी पल्लवी ह्यांनी हे सगळ्या प्रेक्षकांच्या आवडीने करण्यात आलंय असा ऊपकाराचा कितीही आव आणू दे.

Thursday, January 15, 2009

अमर जी ओक, एक कार्यक्रम करता का?

अमर जी ओक तुम्ही गेले दोन दिवस दिसला नाहीत. आम्हाला रूखरूख वाटली. तुम्ही विदर्भात कार्यक्रम केलात. पुण्याला ही एक करून टाका की राव. तुम्ही आमचे फेवरिट आहात. एक कारण म्हणजे आम्हाला तुमचं बासरी वादन लई आवडतं. दुसरं तुम्ही काँम्पुटर ईंजीनीअर, आमच्या क्षेत्रातले म्हणून आम्हाला अजूनच जवळ. आणि तिसरं म्हणजे तुम्ही आमचा प्रॉब्लेम सोडवू शकता असं आम्हाला कळलंय. सकाळ च्या विदर्भ पुरवणीत आम्ही हे वाचलं बघा.


आमची सौभाग्यवतीही आमच्याची रोज कचाकचा भांडते. तिला घेऊन आलो तर "एका दगडात दोन पक्षी." बासरीने कान तृप्त ही होतील आणि नंतरच्या काही दिवसाच्या शांततेने त्या सूरांची जादू तशीच टिकून हीराहील

Monday, January 12, 2009

वसंतोत्सव आणि सा-रे-ग-म-प स्पर्धकां संबंधी

ह्या वर्षी मी वसंतोत्सवाला गेलो नाही. जावसं वाटलं नाही. मागच्या वर्षी आलेला अनुभव आणि इतर काही संबंधीत विचार, ही कारणं. कदाचित काही वाचकांना पटावीत.

१. मागच्या वसंतोत्सवात नाना ने वाजवीपेक्षा जास्त बोलून बोअर केलं. निदान मला तरी बोअर झालं. त्यात त्याने प्रेक्षकांचा अपमान केला. एका श्रोत्याने "वन्स-मोअर" दिला. नाना म्हणाला "केवळ आपण तिकिट काढलंय ह्याचा अर्थ आपण काहीही फर्माईश करावी का? आधी स्वतः काहीतरी होऊन दाखवा." मला कळलं नाही. म्हणजे काय? एकतर हा श्रोता त्याच्या पेशात, क्षेत्रात मोठा नसेल कशावरून? समजा नसला, तरी पैसे देऊन कार्यक्रमाला आल्यावर वन्स मोअर द्यायचा त्याला हक्क नाही? आणि नसेल तर त्याचा असा अपमान करण्याचा अधिकार पाटेकरांना कोणी दिला? नाना हा कलाकार म्हणून श्रेष्ठ आहे ह्यात काहीच वाद नाही. पण एकंदर अशा बडबडीमुळे एकंदर कार्यक्रमाविषयीचा आदर कमी झाला.
२. राहुल देशपांडे च्या गाण्याला मागे साथीला डॉ. विजय कोपरकर बसले होते. राहूल हा वसंतरावांची सगळीच गाणी हूबेहूब आणि छान म्हणतो. पण अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये त्याला बराच पल्ला अजून गाठायचा आहे. मला तरी हे हरभजन सिंग ने सचिन तेंडूलकरला रनर म्हणून घेतल्यासारखं वाटलं.
३. सवाई गंधर्व शी स्पर्धा. ती जरूर असावी आणि करावी. पण किती कराल, आणि किती घाई? विकिपीडीयाच्या पूणे पेज वर भला मोठा भाग "वसंतोत्सव" वर टाकाल? माझ्या मित्राने चीड येऊन तो ताबडतोब काढून ही टाकला. (हे एक विकिपीडीयाचं खूप छान आहे).
४. सा-रे-ग-म-प च्या बालकलाकारांचा कार्यक्रम आयोजित करणं. बरेच जण म्हणतील की ह्यात चूक ते काय? तसं पाहिलं तर काहीच नाही. आपला कार्यक्रम यशस्वी ठरावा आणि त्याने गर्दी खेचावी ह्या साठी वसंतोत्सव ने सर्वतोपरी प्रयत्न केले तर त्यात काहीही वावगं नाही. हे बालकलाकार गातात छानच. पण त्यांना आपण किती गायला लावावं? दर आठवड्याला गाऊन गाऊन त्यांचा आवाज थकलेला अधून-मधून जाणवतो. भारतीय क्रिकेट टीम ची मध्ये जशी क्रिकेट बोर्डाने एकामागोमाग एक वन-डे सिरीज खेळायला लावून अवस्था केली तसंच हे होतंय.

ही मुलं प्रचंड क्षमता आणि आकलन शक्ती घेऊन जन्माला आली आहेत. ईथून पुढची त्यांची वर्ष ही सरावाची आहेत. स्वतःचा आवाज, शैली शोधण्याची आणि तयार करण्याची आहेत. ते आपण त्यांना करू दिलं तर आपल्या आवाजाने ते पुढची अनेक तपं रसिकांची सेवा करतील. मात्र आपण त्यांना आत्ताच ह्या व्यावसायिक स्पर्धेत ओढलं तर त्यांचं करियर दाजीबासारखी चार गाणी आणि ऊरलेला वेळ ती ऑर्केस्ट्रा मधून गात राहणं ह्याच्या पलिकडे जाणार नाही. कदाचित आज वसंतराव असते तर वाडकरांसारखाच् ह्या मुलांनी अजिबात कार्यक्रमांच्या फंदात न पडता अभ्यास चालू ठेवावा असा सल्ला त्यांनी दिला असता. मात्र एवढी बांधिलकी दाखवणं वसंतोत्सवाने गरजेचं मानलं नसावं.

कार्यक्रम सुंदर झाला असं लोकसत्ता मधून वाचण्यात आलं.

Saturday, January 10, 2009

बातम्यांचे जन्म आणि त्यासंबंधीचे विषयांतर

विषयांतर हे "संबंधीचे" कसे असेल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो सोडवा, आज रविवार आहे, तुम्हाला नेहेमीपेक्षा जास्त रिकामा वेळ असणे अपेक्षित आहे. आणि रिकामटेकडे नसूनही हा ब्लॉग वाचत असाल तर आम्ही आणि आमचा मोत्या तुम्हाला हसतो आहोत. असो. आज आमचा घसा बसला आहे. त्यामुळे जीभेवरच्या सरस्वतीला आराम देऊन बोटांमधल्या गणेशाला आम्ही कामाला लावतो आहोत. (आजच्या आत्मप्रौढीत ऊद्याच्या लोकप्रियतेची बीजे असतात हे सिनेसृष्टीकडून मिळालेले बाळकडू पिऊन आमचा शम्मी कपूर झाला आहे. असो.) बोलण्याचा डेफिसिट लिहीण्यातून भरुन काढताना मूळ मुद्द्यापासून भरकटणे क्रमप्राप्त आहे. (ऊदाहरणार्थ-पुढची काही वाक्ये) खरंतर मुद्देसूद वाक्ताडन हे आमच्या साठ्यामधले एक जालीम शस्त्र आहे, पण ते आम्ही ब्रम्हास्त्रासारखं जपून वापरतो. अगदी ब्रम्हास्त्र नाही तरी सुदर्शन तर नक्कीच. पण ते सोडू म्ह्टलं तर टारगेटेड दुर्वास पळणार कुठे? ट्रॅफिक किती वाढलाय !

मोत्या कंटाळून निघून गेला वाटतं. तसाही तो थांबला नसताच. "दिलखुलास" ची वेळ झालीय. प्रत्येक सडेतोड ऊत्तरावर तो भुंकून दाद देतो. ह्या वेळेत तो सगळ्यात कमी भुंकतो म्हणून आमचे शेजारी तेव्हा रविवारचं झोपून घेतात. असो.

तर मुकुलायन च्या असंख्य वाचकांनो (सहावी "क" म्हणजे त्रिखंड काय रे मोर्‍या?), तुम्ही अजून जागे असाल तर आज तुम्हाला ही पत्रकार मंडळी बातमी कशी जन्माला घालतात ह्याचा एक किस्सा सांगणार आहे. मात्र लवकर सांगा अशी घाई करायची नाही बरं का. तर ह्या पत्रकारमंडळीं पैकी काही खूप हुशार असतात बरं का. (खूप हुशार म्हणजे ऊरलेल्यांशी तुलना करू गेल्यास. सापेक्षतावादाने का प्रवादाने.) ती असं काही लिहीतात की वाचणार्‍या तुम्हाआम्हाला काहीतरी वेगळंच वाटतं.

झालं असं की आमचा एक लग्न न झालेला, जाड चष्मेवाला, साधासुदा-सदा असा मित्र आहे. आमचे सगळे मित्र असेच अळणी - आमच्यासारखे. आता हेच पहा, आम्हाला कित्येक दिवस तो डान्स बार कसा असतो तो ह्याचि देहि डोळा पाहण्याची ईच्छा होती. आबांना काही लोकांचं बरं बघवलं नाही. त्यांनी बंदी आणण्याआधी आम्ही खूप प्रयत्न केले की कोणी मित्र ते दाखवेल का आम्हाला. पण जाऊन आलेला एकजण माहीत नाही हो. नाही त्या गोष्टी दाखवायला सगळे ऊत्सुक. म्हणजे एकाने आम्हाला "पारी" चे रोबोटीक आर्म्स कसे चालतात ते दाखवले. एकाने आम्हाला आय.आय.टी. मधला तो नाच्या "नटराज" रोबो दाखवला. आता यांत्रिक हात-पाय आणि त्यांच्या हालचाली बघायलाच फक्त आमचा जन्म का? तर ह्याचं ऊत्तर हो. हेच ईन्कम टॅक्स ऑफीस, सिनेसृष्टी, मिडीया, पोलीस, आर्.टी.ओ., सचिवालय ईथे कुठे काम करणारा कोणी मित्र असता तर अगदी तरन्नुम नाही पण कोणीतरी मानवी स्त्रीरूप हातपाय हलवताना आम्ही पाहिलं असतं की नाही? सोडा.

सांगायचा मुद्दा की हा आमचा अगदीच साधा मित्र आम्हाला म्हणाला की "पतंगराव कदम कुस्ती खेळतात तुला माहितीय का?". मी म्हणालो की "अरे त्यात नवीन काय? राजकारण आहे बाबा ते. आणि हे असं कारण नसताना ऊपमा अलंकारात बोलायला आपण काय कुठल्या च्यॅनल च्या ऍवॉर्ड फंक्शन चे होस्ट का अँकर का काय ते आहोत का?". तो म्हणाला "नाही रे खरीखुरी कुस्ती. हे वाच" त्याने ई-सकाळ१० पुढे केला. त्यात खरंच लिहिलं होतं हो, की "पतंगराव कदमांनी कुस्तीचा आनंद लुटला". आम्ही त्याला समजावलं की "अरे वेड्या, म्हणजे त्यांनी कुस्ती बघण्याचा आनंद लुटला असं म्हणायचं आहे". मग ते तसं का नाही लिहिलं हा त्याचा प्रश्न आलाच. त्यानंतर आम्ही त्याला जे सांगितलं तेच आता आम्ही तुम्हाला संक्षिप्त रूपाने येथे सांगत आहोत, सत्यनारायणाच्या पूजेतल्या गोष्टीसारखं.

दोन प्रकारचे पत्रकार असतात. एक आपण जे लिहितो आहोत त्याचा (मराठी) भाषेतला अर्थ काय होईल ह्याची कल्पना आणि अक्कल नसणारे. दुसरे, आपण जे लिहितो आहोत ह्याचा अपेक्षित नसलेला अर्थ काय होईल ह्याची पूर्ण जाणीव असताना, मुद्दाम नवीन बातमी जन्माला घालणारे. सांख्यिकीचा (स्टॅटिस्टिक्स) विचार करता, ही बातमी देणारी व्यक्ती पहिल्या प्रकारची असण्याची शक्यता खूपच जास्त आहे. मात्र दुसर्‍या प्रकारच्या व्यक्तींचं कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. ह्याच पार्श्वभूमीवर आता मि. क्ष ने मि. य ला सांगितलेला एक किस्सा मी तुला सांगतो तो तू नीट ऐकावास.

एकदा एका लहानशा शहरास एका धर्मगुरूने भेट देण्याचे ठरवले. अपेक्षेप्रमाणे आगमनाच्या वेळी विमानतळावर पत्रकारांची गर्दी जमली. धर्मगुरू विमानातून ऊतरता ऊतरता एका चतुर पत्रकाराने पहिला प्रश्न विचारला "आमच्या शहरातील वेश्यांच्या समस्येबद्दल तुमचं काय मत आहे?" धर्मगुरूंनी आश्चर्याने विचारले "तुमच्या शहरात वेश्या आहेत?" लागलीच पेपर मध्ये बातमी छापून आली, "विमानातून ऊतरल्या ऊतरल्या, धर्मगुरूंचा पहिला प्रश्न, तुमच्या शहरात वेश्या आहेत का?"

तर वाचकहो तुम्ही योग्य तो बोध घेतला असेल. बातमी जन्माला कशी घालावी हे तुम्ही आज शिकला असालच. ऊद्या पत्रकार झालात तर आम्हाला नक्की दुवा द्या.

१. आमच्या ज्ञानाच्या कक्षा कशा जयललितासारख्या विस्तृत आहेत पहा
२. रंगरूपावरून कोणाची अशी चेष्टा करणं आमच्या तत्त्वात बसत नाही. पण हे लिहिलं नसतं तर आमचं हे तत्त्व तुम्हाला सांगता आलं नसतं म्हणून केवळ.
३. खरंच ट्रॅफिक खूप वाढलाय.
४. प्रत्येक तळटीप ही वाचण्यायोग्य असतेच असं नाही. असो.
५. ह्या लेखात असो हा शब्द किती वेळा आला आहे मोजा पाहू. ६,७
६. नं ७ ही तळटीप नसून नं ५ ची शिखरटीप आहे.
८. वाचा - ऊदयाचल - माझी संपदकीय कारकीर्द, गोळाबेरीज, कोणतीही आवृत्ति. लेखक - पु.ल.देशपांडे.
९. आम्ही आमची लायकी ओळखून असतो. कुठे मुरलीधरन, कुठे आम्ही.
१०. हे संभाषण ई-मेल वर झालं आणि त्याने कालच्या ई-सकाळ ची लिंक फॉरवर्ड केली. ऊगाच ऑनलाईन पेपर पुढे कसा केला असे फालतू प्रश्न विचारू नका.

Friday, January 9, 2009

बापूजी (आत्रंग्यांचे), आमच्या रामू भैय्याला नोकरी मिळेल का?

प्रिय बापूजी, पत्रकारिता क्षेत्राबद्दलचं आमचं ज्ञान म्हणजे मल्लिकाच्या स्कर्टापेक्षा तोकडं. आम्हाला त्यातलं ओ का ठो माहित नाही. वर्तमानपत्रांची किंमत ही आम्ही त्यांना मिळणार्‍या रद्दीच्या भावातून करतो. ही आमची (का त्यांची?) लायकी. मात्र आम्ही तुमच्या बातमीदार आणि कळत-नकळत चे अगदी नियमित वाचन करतो. आम्ही लहान होतो तेव्हा रस्त्यात मारामारी दिसली की बघ्यांमधला आमचा नंबर पहिला. शाब्दिक फटकार्‍यांबद्दल आम्ही वय वाढलं तशी ही आवड वाढवून आहोत. त्यामुळे "एस-एम-एस" आला रे आला की वाचणार्‍यांमधले आम्ही पहिले. सांगायचा मुद्दा मात्र हा नाही.

तुमचे तेजाबफेकू (हे आम्ही कौतुकाने म्हणत आहोत) ब्लॉग वाचून, आम्हाला तुमचं ते पत्रकारिता क्षेत्र हे एकंदरीत एकदम मजेदार वाटू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी "कळत-नकळत" मध्ये तुम्ही जॉब बद्दल जाहिरात दिली होती की "पाहिजेत मुंबई लोकमतला पत्रकार". ती वाचून आमच्या डोळ्यासमोर ताबडतोब आमच्या रामू भैय्याची मूरत ऊभी राहिली. (ऍक्च्युअली ती गादीवर बसली होती) त्यात लिहिलंय की "उपसंपादक/वार्ताहर पदासाठी किमान पदवीधर, दोन वर्षांचा आणि पाने लावण्याचा अनुभव या किमान अटी आहेत".

तुम्हाला सांगतो
आमचा रामू भैया रांचीचा बी.ए. आहे - म्हणजे पदवीधर वर टीक मार्क.
आम्ही गेले ८ वर्ष त्याच्या ठेल्यावर तोबरे भरून तोंडं लाल करायला जातो. - दोन वर्ष काय चौपट अनुभव - टीक मार्क.
आणि मुख्य म्हणजे पाने लावणे. ह्यात तर त्याचा हात कोणपण ध्ररू नाही जात. आम्ही सगळ्या गल्ल्या, रोड्स पालथ्या घातल्या, अगदी त्या कर्वे रोड्च्या ए.सी. शौकीन मध्ये पण गेलो. पण बनारसी, कलकत्ता, मघई, फुलचंद, पूना सादा काही पण सांगा. रामू भैय्या सारखा पाने लावणारा कोणी शोधून दाखवावा ! ह्यात तर एकदम मोठ्ठं टीक मार्क.

त्यात तुमच्या क्षेत्रात लागणारी बातम्या पुरवण्याची हौस? अहो, आम्ही एकदा का ठेल्यावर गेलो की आठवड्याची सगळी बित्तंबातमी आम्हाला मिळते. त्यात पुन्हा तीऐकली की तिची शहानिशा न करताच रामू पहिल्याछूट नंतर येणार्‍यांना ऐकवतो. हे तुमच्या बातमीदारांच्या किस्स्यांशी एकदम तंतोतंत जुळतं की नाही? त्यात भर म्हणजे त्याची पाने पुसण्याची कला. म्हणजे एकदम पानावर चेरीच झालं.

आमच्या रामूला रोज रोज तंबाकू चोळून कंटाळा आला आहे. हात काळेच करायचे तर शाईने करू असं म्हणाला होता एकदा. परवा सकाळच्या पान-सुपारी कार्यक्रमाला आपला ठेला असावा असं त्याला राहून राहून वाटत होतं. तुम्ही सांगा की त्याला ही नोकरी मिळेल का. संपादकांना रोज सुपारी कातरून ही देईल तो.

Wednesday, January 7, 2009

"गुड-मॉर्निंग" पथक करणार मॉर्निंग बॅड

कालच्या ई-सकाळ मधील वृत्त्तानुसार "गुड-मॉर्निंग" नावाचं पथक सासवड मधे एक अभियान सुरु करत आहे. कसलं ते सकाळ च्या शब्दातच वाचा.

आपापल्या पोटांची स्वच्छता करणार्‍यांना जागीच अटक करून थेट पोलीस स्टेशन ला आणलं तर त्यांच्यावर पुढची कारवाई म्हणजे नक्की काय करणार ह्याचा विचार करता करता आमची मती कुंठीत झाली आहे.

बातमीतल्या लाल वर्तुळातील आडनावाचा बातमीशी संबंध असण्याचा योगायोग चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटला नसेलच. वास्तविक आम्ही नावा-आडनावावरून थट्टा करण्याच्या विरुद्ध आहोत मात्र वर्डस्वर्थ ने म्हणल्याप्रमाणे नावात काय आहे?

१ खरं तर हे शेक्सपिअर ने म्हणून ठेवलंय, पण नावात काय आहे?